वर्षभरात राबवावयाचे उपक्रम

जयंती / पुण्यतिथी

वर्षभरात शाळेच्या दिवशी अथवा सुट्टीच्या दिवशी येणारी जयंती वा पुण्यतिथी शाळेत नियमितपणे साजरी केली जाते. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन एका वर्गाकडे दिले जाते. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यार्थ्यांमधूनच निवडले जातात. इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना भाषणाची संधी उपलब्ध करून दिली जाते. तसेच त्याच्या भाषणाची तयारी वर्गशिक्षकांमार्फत करून घेतली जाते. कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीला आमंत्रित केले जाते.
वर्षभरातून झालेल्या सर्व कार्यक्रमातील भाषणांचे मूल्यमापन केले जाते. त्यातूनच वक्तृत्त्व कलेचे बक्षीस दिले जाते. त्याचप्रमाणे ज्या वर्गाचा प्रतिसाद उत्तम असेल त्या वर्गशिक्षकांचाही शाळा व्यवस्थापन समिती मार्फत उचित गौरव केला जाणार आहे.

क्रीडा स्पर्धा

दरवर्षी जि.प.अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धांची तयारी करावी लागते. ऐनवेळेस तयारीला न लागता विद्यार्थ्यांचा नियमित सराव असावा या हेतूने सर्व वर्गांतील विद्यार्थ्यांचे कायमस्वरूपी चार गट तयार करून घेतलेले आहेत. शालेय स्तरावर गटांतर्गत स्पर्धा आयोजित करून पुढील केंद्रस्तर, बीटस्तर, तालुकास्तर व जिल्हास्तरासाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते. दरवर्षी शाळेचे खेळाडू केंद्र, बीट, तालुका व जिल्हा स्तरापर्यंत जाऊन उल्लेखनीय कामगिरी बजावतात. चालू वर्षीही ऑक्टोबर / नोव्हेंबर महिन्यात या स्पर्धा शालेय स्तरावर आयोजित केल्या जातील.

बालआनंद मेळावा

दरवर्षाप्रमाणे या वर्षीही बालआनंद मेळाव्याचे शाळास्तरावर आयोजन करण्यात येईल. यात विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ, गमती-जमती, स्टॉल्स, खाऊची दुकाने, कला, कार्यानुभव याचे प्रात्यक्षिक यांचा समावेश असेल.

शैक्षणिक सहल व परिसर भेट

चालू शैक्षणिक वर्षात ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याच्या हेतूने इयत्ता 4 थी ते 7 वी तील विद्यार्थ्यांची दोन दिवसांची शैक्षणिक सहल काढण्यात येईल. सहलीमध्ये सहभाग घेण्याची कोणत्याही विद्यार्थ्यावर सक्ती नसेल. शाळा व्यवस्थापन समिती व वरीष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून सहलीचे ठिकाण व नियोजन केले जाईल.
तसेच प्रथम व द्वितीय सत्रांत विद्यार्थ्यांना जवळपासच्या महत्त्वाच्या स्थळांना भेट देऊन तेथील अभ्यास करण्यासाठी वर्षातून दोन वेळा परिसर भेटीचे आयोजन करण्यात येईल. परिसर भेटीसाठी सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग बंधनकारक असेल.

क्षेत्रभेटी

इयत्तावार अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या घटकानुसार परिसरातील विविध कारागीर, बँक, पोस्ट ऑफिस, औष्णिक विद्युत प्रकल्प, वीटभट्टी, शेती-पिके, नदी, धरण, बाजार, ग्रामपंचायत, दवाखाना इ. ठिकाणांना प्रत्येक वर्गाच्या नियोजनानुसार भेटींचे नियोजन वर्षभरात केले जाईल.


1 comment:

Thanks ! Please visit again.
कृपया आपली प्रतिक्रिया खाली जरूर नोंदवा.